Sunday 11 June 2017

प्रवास २ राजधान्यांचा .. राजगड ते रायगड ( via सिंगापूर ) भाग 1

आज सकाळी कामानिमित्त बाहेर निघतोय ..जाताना बॅग घेतली खूप हलकी वाटतीये, कदाचित मोहिमेचा परिणाम असावा ...
      सतत भास होतोय कि डोक्यावर टोपी आहे ..पाण्यात ओला केलेला टॉवेल , हातात काठी आहे व पाठीवर जड झालेली बॅग आहे ..
    चार दिवसाची शिदोरी ,पोळी , 3 लिटर पाणी , पाण्याचा बाटल्या आणि लोणचं
     सकाळची भयंकर थंडी ,
                     तो थंडगार गारवा ,
दुपारची अंगाची लाहीलाही करणारं कडक ऊन ,
आणि रात्रीच जागरण ।।।।
                     रात्रीची तंबूत काढलेली रात्र ,
ती स्मशान शांतता .......
       नदीतील थंड पाण्यात केलेली अंघोळ , सकाळचा चहा ,राहुलने केलेली चुलीवरील मॅगी , सुरेंद्र काकांनी दिलेली हाक ( चला रे कार्यकर्त्यांनो ), मिहिरचा ओसंडून वाहणारा उत्साह व अवधूत आणलेला ( life saviours चिवडा ) आणि डेपाळलेला मी

रायगड 


 बर  असो थोडस आपल्या सह्याद्री विषयी : - 
                                                    सहयाद्रीने मला काय दिले हे विचाराल तर ..आज जे काही थोडेफार धाडसाने करतोय ती या सह्याद्रीचीच कृपा ..सह्याद्री प्रत्येकवेळी नवीन काहीतरी देतोच ..स्वावलंबन ,प्रसंगावधान ध्येय , चिकाटी ,निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला वेळोवेळी पडले . जगणाच्या एक वेगळाच अर्थ जणू कथित करून गेला ..आम्ही आताच पायदळ घातलेल्या गुंजन मावळातील व शिवथर खोऱ्यातील क्षण , मनी साठविलेले एक एक दृश्य, जगलेला एक एक क्षण अजून सुध्दा ताजाच आहे .सर्व क्षण सर्रकन ......।।।। डोळ्यासमोरून जातायेत ..इथल्या रौद्र सौन्दर्यात, रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे ...एकदा का तुम्ही या विश्वात सामील झालात कि परतीचे दोर आपोआपच कापले जातात ... जो कुणी येतो तो या जादुई दुनियेत रमून जातो .... # पण एक मात्र सर्वांनी नेहमी लक्षात ठेवावं आत्मविश्वास असावा साहसीपणा असावा पण आततायीपणा नको ।।आपण जिथे जातो तिथे आपल्या आठवणी शिवाय काहीही मागे ठेवू नये #
      भटकंती म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नव्हे .तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे . जेणेकरून तुम्ही आम्ही निसर्गाशी एकरूप होऊन जाऊ ..नियमित भटकणाऱ्या ना विचारलं जग कसे आहे ... सर्वांचं एक उत्तर येईल सुंदर ...
              अशीच गुंजन मावळात विसावलेला राजगड , तोरणा . एक अभेध्य सुळका लिंगाणा आणि शिवथर खोऱ्यातील स्वराज्याची आपली राजधानी रायगड .. अशी 4, 5 दिवसाची भटकंती साध घालत होती .. माझे तसे 2 हेतू होते ... एक तर 4 जून ला होणाऱ्या ( ना भूतो ना भविष्यती ) अश्या 32 मन सुवर्ण सिहांसन पुनर्र स्थापनासंकल्प सोहळा सोहळा श्री रायगडावर होणार होता ..त्या सोहळ्याचे आमंत्रण श्री राजगडाला द्यायलाच। हवे .कारण ती स्वराज्याची पहिली राजधानी .कदाचित राजगड हि रायगडाकडे डोळे लावून बसला असेल .त्यामुळे राजगड ते रायगड पायी भ्रमंती चा संकल्प केला . दुसरा हेतू असा की गेल्या काही महिन्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावलो नव्हतो .त्यामुळे ती सुद्धा खल भरून काढायची होतीच..
सुरुवात 


          4 जून च्या सोहळ्याला उपस्थित राहायचे असलेने 30 तारखेला सुरुवात करणे क्रमप्राप्त होते . पण काही कारणास्तव 31 मे ला सुरुवात करायची असे ठरले . आम्ही पाठीवर बोजे घेऊन सकाळी स्वारगेट  बस स्थानकावर डेरे दाखल झालो.. कोण कुठले ५ भटके फक्त सह्याद्री प्रेमापोटी व भटकंतीच्या वेढामुळे एकत्र आले.. . सकाळी ८ ची वेल्हा लागली आणि आमचा श्री गणेशा झाला .. वैदेही ची रजा घेऊन पुढे निघालो .. ( वैदेही , राहुल , मिहीर हे माझे पुण्यातील भटके मित्र , यावेळी राहुल, मिहीर सोबत येत होते पण वैदेहिची आमच्यासोबत यायची प्रखर इच्छा असूनही जमले नाही ... नेक्स्ट time नक्की जाऊ असे सांगून निरोप घेतला) ..
          बस हळू हळू कात्रज चा घाट ओलांडून सुसाट वेगाने नसरापूर highway ला लागली.. मधेच कात्रज ते सिहंगड ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या .. पण आता सिहंगड कधीही पाहायचा नाही हे ठरवले आहेच ..राव पर्यटन स्थळ करून टाकलाय ( गडकोट हे पर्यटन स्थळ ? कल्पना पण करवत नाही) असो ९.३० ला मार्गासनी उतरून एस.टी ला  $ जय महाराष्ट्र $ केला ... इथून डावीकडे एक वाट जाते ती राजगडा कडे .. अजून ३ मैल लांब गुंजवणे हे पायथाचे गाव .. त्यात पूर्ण डांबरी रस्ता.. वाट लागतो पायाची .. या येत्या काही दिवसात आम्हाला प्रत्येक गड जगायचं होता.. त्याचं इतिहासात रमून जायचं होतं...
गावगावत चालू असलेली मशागतीची लगभग ( चाहुल मेघ सरींची )

11 वाजता गुंजवणे गावात पोहचलो . त्याचा पायथ्याला चिकटलो न वरती पाहिलं .. बस्स्स.............आपण या सह्याद्रीचा अगंधपणापुढे किती शूद्र आहोत याची पुरती जाणीव झाली. या सह्यशिरेचा स्वामी शिवशंकर आहे . सह्याद्रीच्या गिरीशिखरावर शंभू महादेव ठाण मांडून बसला आहे.. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ,भौगोलिक जडण-घडणी मध्ये सह्यगिरीचे स्थान अलौकिक आहे.. लिहिण्यासारखं बरंच काही आहे ..पण नंतर लिहीन यावर कधीतरी
सहभागी भटके अणि मागे अभेद्द राजगड 

          आम्ही गुंजवणे हुन चोर दरवाजा वाटेवरून सुरुवात केली . मागच्या वेळी शॉर्टकट मार्गाने गेलेलो ती वाट सापडली नाही . अक्षर:श्या जंगलातून, काट्याकुट्यातून वाट काढत निघालो.. मूळ वाट डोंगरधारेवरून जाते., आम्ही मात्र डोंगराच्या बाजूने उन्हाच्या झरोळ्यातून घसरांच्या वाटेवर पोहचलो . अंगाची लाहीलाही करणारे कड़क ऊन , भरकटकेली वाट आणि नजरेत च धडकी भरणारा राजगडाचा डोलारा . सुरुवातच खडतर झालेली . सह्याद्रीने आपला कौल दाखवायला सुरुवात केलेली अजून खूप काही बाकी होत. आपला चांगलाच कस लागणार हे एव्हाना कळून चुकले . लक्ष होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा, डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची त्यात असलेलं नैसर्गिक नेढ, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला .. काही वेळाने पाणी पिऊन ताजेतवाने होऊन पायपीट सुरु केली . काही वेळात थोडासा चढ चढून गेलं की एक घसारा लागतो ..
राहुल राजे घसारा पर करताना टॉप स्पीड मधे 

इथून मात्र वरपर्यंत वाट दिसते ..पण इथून पुढे फक्त चढाईचा मार्ग ..पुरती दाणादाण उडते... एक लक्षात घायला हवे .हा राजगडाचा। राजमार्ग नसून चोरवाट आहे. कुठे गर्द कारवी च अरण्य तर कुठे बोडकी झाडे ..इथे एक पाण्याचे टाके आहे..
राजगाड चोर दरवाजा मार्गावर विसावा 
इथून ६० फूट वर तटबंदीमध्ये लपला आहे तो चोर दरवाजा .
 सुरेंद्र काका ( चोर दरवाजा मार्ग ) सुरक्षिततेसाठी रेलिंग 
वरपर्यंत पायऱ्या आहेत.. एका बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला उभा कातळकडा ...इथून दिसणारे दृश्य विहंगम च आहे.. आता सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग लावले गेलेत.. आत गेल्यावर ९० अंशात वाट डावीकडे वळते
निसर्ग सौंदर्य



चोर दरवाजा मधून जाताच ९० % वरती जाणाऱ्या पायऱ्या 






.जवळपास 10 ते 15 पायऱ्या चढून वर गेल्यावर पद्मावती तलाव लागतो .सध्या इथे पर्यटक निवासस्थान आहे पण।।।खूप गलिच्छ त्यामुळे आम्ही पद्मावती देवी मंदिरात बैठक मारली ..तिथे भेटलेल्या कचरे काकू कडून चहा घेतला. शिदोरी सोडली... वेळ फार कमी असलेने लगेच किल्ला पाहावयास गेलो. पण दुपारी ४ वाजताच भन्नाट वारा, गडद धुकं त्यामुळे सारा गड झाकोळला गेला... निदान सूर्यास्त तर पाहता येईल अशी भाबडी आशा ठेवत बालेकिल्ला गाठला.. जाता जाता राहुल ला आम्ही उद्या जिथून जाणार आहोत तो संजीवनी माचीचा मार्ग दाखवला... त्याची तिथेच तरतरलेली..कारण प्रचंड धुकं.. त्यात पुढे काहीच दिसतं नाही .जेमतेम 1 फुटाची पायवाट .. हे बघून कुणाचीही अशीच अवस्था होईल.. ज्यावेळी मी पहिल्यांदा आलेलो त्यावेळीही माझी अवस्था याहून काही वेगळी नव्हती आम्ही तर रात्री 3 वाजता पार केला होता...बालेकिल्ला फिरून ( फक्त दरवाज्याला स्पर्श करून म्हणा ना) कारण बालेकिल्ल्याचा मार्ग हि खडतर .आणि त्यात थोडा जरी अंधार पडला तर अवघड ..त्यामुळे माघारी आलो.. काही काळ सदरेजवळ बसून देवळात परत आलो... प्रचंड वाऱ्यामुळे आमचा मॅगी चा बेत बारगळला त्यामुळे घरातून आणलेलं अन्न खाऊन मंदिरातच तंबू टाकला.... बाकीचे मंदिरात असताना... सहजच बाहेर पडलो... पद्मावती मंदिराच्या मागे माचीच्या तटबंदीत नाग राजांनी दर्शन दिलं.. ( इथे साप आहेत हे कुणालाच कळून दिलं नाही ..आधीच भीती होती हे आणखी कश्याला , त्यामुळे खबरदारी म्हणून मी राहुल, मिहीर ,अवधूत बरोबर फिरलो कुणालाही अजून देखील माहिती नाही मी का त्याच्या मागे पुढे फिरत होतो, आता कळेल म्हणा)




गड सर केल्याचा आनंद 

बालेकिल्लावरील दरवाजा 

बालेकिला व्  संजीवनी माची कड़े जाणारा मार्ग 

राज सदर ( त्याचे जीर्णोंदार सुरु असलेले काम )

        राजगड पाहायला किमान ३ दिवस हवेत , एक दिवस बालेकिल्ला, एक दिवस सुवेळा माची, आणि एक दिवस संजीवनी माची असा प्लॅन केला तर राजगड किती अभेध्य आणि बेलाग आगे याचा थोडासा प्रत्यय येईल ..रात्री झोपी जायच्या आधी उद्या सकाळी उजाडलं कि निघू रे असा विनंती वजा फर्मान सोडला..
कचरे  काकू ,आजी   आमच्या मुक्कामाचे ठिकाण 


   दिवस दुसरा --  आज सकाळी पहाटे ५ वाजता उठून संजीवनी माचीवरून अळू दरवाजा ने तोरणा जवळ करण्याचा हेतू होता.. कारण तब्बल 6 तास  पायपीट करून ते साध्य होणार होत.. पण सकाळी काहीच दिसेना ... टॉर्च च्या प्रकाशात फक्त 3 ते 4 फूट दिसेल अशी चिन्हे ..त्यात काल जे काही पाहिलंय त्यामुळे ही पोर इतक्या लवकर चालायला सुरुवात करतील हे शक्यच नव्हतं... सकाळी राहुल ने मॅगी केली . घरात गॅस चा वापर करणारा आज स्टोह च्या मिणमिणत्या ज्वालेतून मॅगी बनवली , आमचा मॅगी शेफ याने या भटकंतीत , स्टोह, चूल अश्या सर्व पद्धतीने मॅगी उत्तम बनवली ..असो सकाळी बाहेर पडायला ७ चा मुहूर्त सापडला .. कचरे काकूंना बिदागी दिली ..त्याआधी देवीला साकडे घालून संकल्प सोहळ्याला यायचं निमंत्रण दिले ..
थोडीशी फोटू ग्राफी welldone राहुल 


पद्मावती मंदिर पासून संजीवनी माची पर्यंत यायला 40 मिं लागली. पण नेमका " अळू दरवाजा " सापडेना .. कुठे धुक्यात लपून बसलेला काय माहिती .. शेवटी मी , राहुल , मिहीर ने खालून तटबंदी पालथी घातली आणि सुरेंद्र काका , अवधूत ने बुरुजाच्या डावी बाजू पालथी घातली... काही वेळाने शोधलाच .. नवख्या भटक्याला सापडणे थोडे अवघडच..फोटू काढायच्या वेळी मात्र सुंदर दर्शन दिले..
आम्ही ५ भटके  आणि मगे (अळू दरवाजा ) 

गडावरील जास्त घनतेमुळे सकाळी 8 लाच कपडे  ओलेचिंब झाले.. पुढे तर घामामुळे असंख्य वेळा स्नान झालेच.. तोरण्यावर जाणारी पायवाट पूर्णपणे मळलेली आहे त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्न नाही ...एक छोटासा रॉक patch उतरून वाट मस्त गर्द वनराईतुन जाते..

मि अणि सुरेंद्र काका अणि मागे सहयाधारेवरून जाणारी मळलेली पायवाट  

मस्त वनराई ( खिंडीकडे जाणारी वाट )

                         
सुंदर रस्ता  



 तिथून पुढे वाट खिंडीत उतरते.. वाटेत मस्त करवंद हाणली.रस्तावरच काही काळ विश्रांती घेतली ... वा असा रस्ता आणि मस्त आल्हाददायक वातावरण ...अलीकडेच शासनाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेत इति काका.. मला तर काय दिसलं नाही पण काकांना दिसला ..असो नंतर तोरणा जवळ करून उतरलो दुपारचे २ वाजलेले होते .इथून पासली फाटा अजून २ प्रहर लांब (अदमासे 6 तास लागणार )पण( देवा घाणेकर) दादाशी फ़ोन वर बोलणे झालेल त्यामुळे त्याने दिलेला सल्ला विचारात घेतला ..त्याने एक जवळची वाट सांगितली.. शेणवड गावी जाऊन मग पुढे पासली फाटा.. ती वाट शोधावीच लागणार होती.. शेवटी डोंगरधारेवरून पश्चिमेला पाहिलं गाव दिसेल तिकडे जायचं असं एकमत झाले.. पाण्याची कमतरता .. जवळपास 15 लिटर पाणी असूनही ( प्रत्येकी 3 लिटर ) आणखी खूप गरज होती.. शरीर त्याहूनही जास्त टॉक्सिक पाण्याचा स्वरूपात बाहेर फेकत होतं.. काही वेळाने उजवीकडे खाली डोंगरमाथ्याला एक गाव दिसले ..थोडा जीवात जीव आला. ओढे ,नाले, दऱ्या पार करत कसेतरी पोहचलो ..येताना पडून लोटांगण घालण्याचे ओपनिंग मीच केलं.. ओपनिंग बॅट्समन चा मान मलाच मिळाला...पोहचलो खरे पण पुरता दम निघाला , घसा पार सुकला होता आणि हृदयाचे ठोके तर ५ वा गियर टाकून फुल स्पीड ने पळत होते.. थोडेजरी over speed झाले असते तर direct यम सदनी होतोच.. गावात पोहचलो खांद्या वरची बॅग उतरवली आणि तसाच बसलो.. सर्वांची तशीच कंडिशन होती.. सर्वांची लागलीच होती. पण तरीही मिहीर ,राहुल ला गावात विहीर शोधायला पिटाळले. पण विहिरीत पाणी मात्र नव्हते..पण गुहिनी गावातील सखुबाई गुहिनी (आजींनी )बोलवून पोटच्या पोराप्रमाणे विचारपूस केली.. पाणी पाजलं.. त्या स्वतः मैलोमाईल लांबून कुठून तरी विकत पाणी आणतात
गुहिनी गावातील ( सखुबाई गुहिनी )

 मागे राजगढ़ ( लोकेशन शोधवी लागेल )

पण आम्हाला निर्मल मनाने पाणी देऊ केलं.. गावातील माणसाचं निराळी.. आजीच्या घरी जेवण करून निघालो.. इथून पूर्ण डांबरी रस्ता ..मेघ पण दाटून आलेलं.. कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली पाऊस पडला तर कसला ट्रेक आणि कसलं काय।।।पन सुरेंद्र काकांनी दिलेल्या आत्मविश्वासाने सांगितलं ...( अरे चला आपल्याला निसर्ग पूर्णपणे साथ देणार अगदी रायगड ला पोहचत नाही तोपर्यंत ) ..आणि झालेही तसंच.. वाटेत कंटाळा यायचा प्रश्न नव्हता.. सुरेंद्र काकांनी केलेल्या भटकंतीचे किस्से, मी केलेल्या ट्रेक अनुभव ,राहुल मिहीर केलेल्या गमती जमती मध्ये संध्याकाळी 6 ला पासली गावात पोहचलो ..


तिथे मस्त 2-2 कप कोरा चहा घेऊन वरोती ला मिहिरच्या काकांकडे जाऊन काही सोय होते का असं ठरवून निघालो. इथून दीड मैला वर ( 4 कमी) आहे अशी माहिती मिळाली.. अजून २ तास पायपीट ..आधीच गेले १२ तास पाठीवर ओझे घेऊन फिरतोय त्यात आणखी २ तास ...पासली फाटा हुन एक रस्ता डावीकडे हरपूड, वरोटी ला जातो तर सरळ मार्ग वेल्हा ते केळद खिंडीतून भोर ला जातो ...वरोटीचा रस्ता गर्द जंगलातून जाणारा ..पूर्ण चढाईचा ..घाट रस्ता.. रात्री अनुभवलेली स्मशान शांतता आम्ही फक्त ५ भटके आजूबाजूला फक्त गर्द काळोख त्यात एक आसरा आमच्या टॉर्च चा मिन मिनाता उजेड . पण असंख्य काजव्यांनी आमचे यथासांग स्वागत केले... पाहता क्षणी सगळा दिवसभराचा क्षीण कुठल्याकुठे निघून गेला...अहा ....काय ते दृश्य वर्णावे ..माझ्याकडे शब्द च नाहीयेत.. असो वरोती गावात रात्री 9 ला पोहचलो .. गावातल्या विठठल मंदिरासमोर बसलो.. काही नाही झालं तर झोपायची जागा आहे असे ठरवून टाकले.. पण मिहिरने " शिळीमकर काकांकडे भारी सोय केली.. अगदी रात्री ९ ला अंघोळीची पण सोय झाली... त्यांचा नवीन बांधलेल्या घरात आमची सोय झाली..
विसावा 


मस्त घरी झोपतो तशी गादी , अंथरून पांघरून अशी सागरसंगीत सोय झाली.. झोपेच्या सोयीचा तसा प्रश्न नव्हताच अगदी रस्तावर पण झोपायची तयारी असते आपली ..पण  दिवस तसा सार्थकी लागला आमचं 2 दिवसाचं अंतर आम्ही एका दिवसात पूर्ण केलं.. रात्री पाठ टेकली आणि जो पाऊस चालू झाला .थांबलाच नाही .मेघ पण वाटच पाहत होते ..आम्ही सुखरूप पोचतो कधी आणि सरी कधी बरसतात कधी..

                                                                                            -----  Pranav Ajit Mangurkar


क्रमशः  भाग २ लवकरच 



सहभागी भटके --




 

















                                           








                    भटकंती करताना हे नेहमी लक्षात ठेवा  




१ ) हा ट्रेक करताना  आपल्या मुक्कामाचे ठिकाण 
आधी निश्चित  करा 
२) अंतर खुप असलेने  योग्य नियोजन करूनच निघा 
३ ) वाटेत पानी मिलाने खुप अवघड आहे। त्यामुळे पानी जपून वापरावे 
४) निसर्गाचा समतोल `राखा। 



.                                    


Monday 6 February 2017

श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड ( श्री पावनखिंड मार्गे )

श्री शिवप्रतिस्थान हिंदुस्थान गेले ३३ वर्षे धारातीर्थ यात्रा (मोहीम ) आयोजित करत आहे
भिडे गुरुजी आणि धारकरी ( प्रेरणा मंत्र ) बोलताना 


धारातीर्थ यात्रा (मोहीम ) कश्यासाठी :-
                                                   याचे  उत्तर खूप सोपे आहे. अखंड हिंदुस्थानाला स्वातंत्र मिळून उणीपुरी सत्तर वर्षे उलटून गेली , तरी पण हिंदुसमाज मनाने पूर्णतः परतंत्रचं आहे . कर्तृत्ववान ,शीलवान ,धैर्यवान ,साहसी ,संयमी ,प्रखर ,स्वधर्माभिमानी उगवत्या तरुणांची पिढी हि राष्ट्राची खरी मूलभूत संपत्ती आहे ,या  कसोटीवर हिंदुस्थान आजही दरिद्रीच आहे .
                                                  श्री शिवछत्रपतींच्या वृत्तीची अवघी तरुण पिढी हि राष्ट्राची क्रमांक एकची निकडीची गरज आहे . यासाठी श्री शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व अनेक हुतात्मांच्या व स्वतंत्रविरांच्या बलिदानाने धारातीर्थ बनलेल्या ,गडकोट्याच्या मोहीमा ,प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात .
             

                                            या वर्षी हि मोहीम  

                              !! श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड !! 

                                                       * श्री पावनखिंड मार्गे  *




                मोहिमेचा कालावधी : -- माघ शु ।। ५ ।। ते माघ शु ।।९।।  ,  श्री  शिवशक ३४३ ( १ फेब्रु ते ५ फेब्रु )





                            







                                           आषाढातील वारकऱ्याला जशी पंढरीची ओढ असते अगदी तशीच ओढ आम्हा धारकऱ्यांना असते ,पण त्यात फरक निश्चितच आहे . आत्मउद्धार ,आत्मसाक्षात्कार ,आत्मउन्नतीचा मार्ग सांगणारा वारकरी प्रवाह आहे . तर राष्ट्रोउन्नती ,राष्ट्रभक्ती ,राष्ट्रसाक्षात्काराचा  मार्ग सांगणारा धारकरी प्रवाह आहे .




चला  !
कुठं जायचं  ?
एका   माणसाच्या  जीवासाठी  धावायचं  कुठवर  ?
बाजी  ! कश्यासाठी  हे कष्ट  घेता  ?
कोण्याच्या  स्वार्थापायी  ?
आणि  तेही  एका  माणसाच्या  जिवापायी  ?
कोणाच्या  सत्तेनं  आम्ही  या  माणसांना  गुंतवलं  ?
कोणाच्या  अधिकाराने ?
 जीवनात  अखेरचं  मोल  असतं  ते  स्वतः च्या  जीवाचं  !
मग  त्या  जिवाच्या  कवड्या  यांनी  आम्ही  मांडलेल्या  पटावर  का  उधळाव्यात  ?
 कसल्या आणि  कुणाच्या  भरवश्यावर  ?
बाजी  , फुलाजी  तुम्ही  स्वामी कार्यासाठी  का  ह्या  अवघड  वाटचालीत  सामील  झालात   ?
कोणत्या  त्यागापायी  ?
हे  व्हावं  हि  तो  श्रींची  इच्छा  आहे असं  आम्ही म्हणालो  , 
पण  हा  महाचंडिकेचा  होम  धडाडत  असता  ,
त्याच  पौरोहित्य  आमच्या  हाती  का  सुपुर्ध  केलंत ?
यातून  खरं  काही साधणार  आहे  का  ?
या  पालखीचा वीट  येतो  !
नशिबानं  या  संकटातून पार  पडतोच  तर  . . . . . . . . . . . . . . . . 
बाजी  , पालखीचा  मन तुम्हाला  देऊ  ! ..........



                              या  आणि  अश्या  असंख्य अनेक प्रश्न - उत्तराचा मागोवा घेण्यासाठी आम्ही हजारो धारकरी 
अखंड हिंदुस्थानातून एकवटलो होतो . पन्हाळगडावरील पुसाटी बुरुजाजवळ चातकासारखी ज्या वेळेची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो . ती वेळ अगदी काही तासांवर येऊन थांबली होती . 
                              घरातून ४ दिवस  पुरेल इतकी शिदोरी ,मुबलक पाणी ,अंथरून ,पांघरून ,हळदीची पुढी ,
विजेरी ( टॉर्च ) , सुई दोरा , दंतमंजन ( कोलगेट ) , लेखणी वही  हे सर्व बॅग मध्ये भरून घराचा उंभरठा ओलांडला . घरातून बाहेर पडल्यापासूनच मोहिमेची सुरुवात झाली होती. . पाठीवर २० - २५ किलो बोजा घेऊन बसची वाट पाहत उभा होतो . क्षणातच बस दाखल झाली . सारा परिसर धारकर्यांनी .. हर हर महादेव च्या गर्जनेने दणाणून सोडला . आम्ही पन्हाळगडावर पोहचलो . गड हिंदुस्तानातून आलेल्या धारकऱ्यांनी फुलून गेला होता .

                              दुपारी सन्माननीय परमपूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी ( गुरुवर्य    . 
   यांच्या बोलीतून पन्हाळगड    ते   विशाळगड जाज्वलं रणसंग्राम अनुभवण्यास सुरुवात झाली . आम्ही कधी ३५० वर्षे मागे शिवकालीन पन्हाळगडावर पोहचलो हे समजले देखील नाही . गुरुजींच्या वाणीतून शिवकाळातून मागोवा घेऊन परततो तितक्यात डॉ आडके नि पन्हाळा गडावरील प्रत्येक वास्तू व त्याचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली . जणू काही त्या प्रसंगाचे आम्ही साक्षीदार आहोत . याची प्रचितीच येत होती . 




                                         



     पर्णालदुर्गाविषयी   थोडेसं   : - 
                                                         पर्णालदुर्ग होय ! श्री शिवकालीन संस्कृत काव्यामध्ये हे नाव आढळते . दुर्ग पन्हाळा ... . . . एक अभेद्य दुर्ग ! प्राचीन दुर्ग ! सुवर्णभूमी महाराष्ट्रातील राजा शिलाहार गंडरादित्य यांच्या राजधानीचा गड . . . ! समुद्रसपाटी पासून वरून हिशेब करता श्री पन्हाळगड २७०० फूट उंच आहे खरा . पण कोल्हापूरपासून हि उंची सुमारे ७०० फूट आहे . येन पायथ्यापासून केवळ २५० फूट उंचीवर पन्हाळा वसला आहे .  श्री पन्हाळगडावर अनेक तळी ,त्यात फुलणाऱ्या कमळावरून पद्मालय असे नाव त्यास लाभले . पुढे काही दिवस आदिलशाहीत हा गड नंदू लागला त्यावेळी शहानबिदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला . आज मात्र पन्हाळा हे सर्वत्र रूढ आहे . 
                           गड चढ़तानाच उजव्या बाजूस स्फुर्तिस्थान आहे . इथपासून तो दि  ६ मार्च १६७३
पर्यंत .श्री पन्हाळा विजापुरांकडे होता . दि ६मार्च रोजी अण्णाजी दत्तो ,कोंडाजी फर्जद ,गंनाजी ,मोत्याजीमामा रवळेकर असे निधड्या छातीचे मावळे केवळ ६० सहकाऱ्यांसोबत पन्हाळगडावर चढाई केली . व एका रात्रीत गड जिंकून घेतला . दक्षिण दिग्विजयापूर्वी आपल्या छत्रपती आणि बाळ संभाजी यांची भेट याच गडावर झाली होती . 

  दक्षिण  दिग्विजयाविषयी  थोडेसं  : -    
                                                               छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या दिग्विजयात तब्बल १११ किल्ले
आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून घेतले ते हि फक्त २१ महिन्यात  ( पावणे दोन  वर्षे ) .विचार केला ते फक्त
सव्वाचार दिवसात  एक किल्ला  जिंकून घेतला .


मोहिमेचा वृंतांत  : -  मोहिमेची सुरुवात श्री पन्हाळा गडावरील पुसाटी बुरुजाजवळ झाली . ती                                                    तुळजाभवानीच्या स्मरणाने . प्रथम भगवा ध्वज , मागे शस्त्र पथक व त्यामागे हजारो धारकरी . रात्री ३. ३० ला ध्वज पुसाटी बुरुजाच्या पाऊलवाटेने खाली उतरला . सर्वानी तुरुकवाडी च्या खिंडीकडे मार्गक्रमन केले . शेवटचा धारकरी दुपारी १२. ४५ ला गडाखाली उतारला . इतकी प्रचंड धारकऱ्यांची संख्या . तुरुकवाडीनंतर उजव्या दिशेला पश्चिमेकडे मसाई चे पठार आहे .  पाचगणी च्या पठारापेक्षाही  खूप मोठं पठार . पठारावर एकही झाडाचा लवलेश नाही. 
                                
मसाई पठारावर जाताना धारकरी 


Add caption
मसाई देवी मंदिर 

पांडवकालीन लेणींकडे जाणारा पठारावरील मार्ग 









पठारावर जायच्या आधी विश्रांती घेऊन पुढे निघालो . आधीच ठरवलं होतं  आता थांबायचं ते थेट मसाई देवीच्या मंदिराजवळ . जवळपास ९ किमी खुलं पठार . आणि आम्हाला तिथवर पोचायला १० वाजले त्यामुळे दुपारचं १२ च कडक ऊन सहन करावं लागलं . पठारावर अलीकडे पाणी साठवण्यासाठी काही प्रयत्न झालेले आहेत . आम्हाला पठार पार करायला ३ तास लागले . मसाई देवीचं दर्शन घेऊन पुढे निघालो . पुढे कुंभारवाडा  - खोतवाडी - केळेवाडी - मंडलाईवाडी - धनगरवाडी - कापरेवाडी - आंबेवाडी - कळकवाडी - रिंगेवाडी - माळवाडी  असे जवळपास ३६ किमी अंतर पार करून  माळवाढीच्या पठारावर जेऊन झोपी गेलो . सर्व शरीर थकलं होत . येताना  असंख्य धारकरी , त्यांची वेगवेगळी बोली भाषा , त्यांचा वागणं त्यांचं बोलणं ,हे पाहण्यात ,अनुभवण्यात  एक वेगळाच आनंद यायचा . 




दिवस दुसरा 
                        
एक छोटीसी खिंड 
एकापाठोपाठ येणारे धारकरी 
                          कालच्या प्रचंड थकव्यामुळे रात्री झोप कधी लागली हे कळेलच नाही . घरी बेडवर  झोप लागणार नाही इतकी मस्त झोप या धरणी मातेच्या कुशीत लागली . आज सकाळी डॉ राजेंद्र चव्हाणके (  सुदर्शन चॅनेल ) प्रमुख यांचे स्वदेशी या विषयावर मोलिक वाख्यान होते . आज चालायचं अंतर खूप जास्त नव्हतं . त्यामुळे सर्वच धारकरी थोडेसं निवांत पणे आवरून माळवाडीच्या शाळेच्या मैदानावर जमले . तिथे काही  श्लोक ,काही गीत म्हणून पुढे वाटचाल केली . आजच अंतर फक्त १८ किमी होत खरं पण दाट अरण्य आणि चढ उतरणीचा मार्ग असल्याने थकवा आजही जाणवला . येतं एक धारकरी आपल्या २ वर्षाच्या छोट्या धारकर्याला डोक्यावर घेऊन चालत होता. त्या छोट्या धारकर्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य नकळत आमचाही उत्साह वाढवून गेलं . आतापासूनच त्या धारकर्याच्या मनावर असे संस्कार घडतायेत .नक्कीच हा धारकरी मुलगा पुढे काहीतरी करून दाखवणार यात तिळमात्र शंका नाही  . . . . .. ..... 
हाच तो २ वर्षाचा धारकरी 
माळवाडी नंतर पाटेवाडी - म्हसवड - मान धनगरवाडा - पांढरपाणी   होता . आम्ही धनगरवाड्यात थांबलो . कोकणी टुमदार घर पहवीत ती इथेच . एकदम छोटंसं गाव . गावात सर्वच धनगर .आम्ही फुलाजी कस्तुरे यांच्या घरासमोर बैठक मांडली . त्यांनी केलेले आदरातिथ्य , आमच्यासाठी खूपच भारावून टाकणारं होत . गावाकडील स्वच्छ निर्मळ  मनाची माणसं ती . तिथे बॅग ठेऊन पांढरपाणी गावांत  श्री तानवडे काकांचे  संस्कृत छंद आणि त्याचे अर्थ जाणून घेतले , मूळ छंद कविराजभूषणांनी कथित'केलेले आहेत . मूळ संस्कृत ,,हिंदी मोडी भाषेत मिळतात . कविराजभूषणांनी संपूर्ण शिवचरित्र फक्त एका ओळीत कथित केले . त्याचं शोधाचे श्रेय श्री भिडे गुरुजी आणि श्री निनादजी बेडेकर याना जातं .




                                 
गुरुजी मार्गदर्शन करताना 


दिवस तिसरा  -  

                    आज काल परवा पेक्ष्या प्रचंड उत्साह होता . कारण हि तसेच होते . आज मोहीम श्री पावनखिंड 
मार्गे जाणार होती . पावनखिंड कधी एकदा पाहतोय असे वाटत होते . बाजीप्रभू देशपांडे च्या रक्ताने 
पावन झालेली ती गजापूर ची खिंड आम्हास खुणावत होती . आम्हाला हाक देत होती . त्याआधी  भंडारा 
( महाप्रसाद ) चा आयोजन होते . आम्ही खिंडी च्या मुखाजवळ पोहचलो . अंगावर काटा च आला . काय ते खिंडीचे रांगडं रौद्र रूप , बाजू प्रभू खिंडीत पुढे लढतायेत .
जंगलातून जाणारी वाट 

पावनखिंडीकडे जाताना 

पावनखिंडीत 

खिंडीतील पाणी 

खिंडीतून वाट काढताना बाबू दादा आणि हनुमंत चव्हाण 


वरून दिसणारी भयावह खिंड 

विसावू या वळणावर 








आणि  हे बोल कानात घुमतायेत याचा भास  होऊ लागला .



राजे  , आता उसंत नाही .तीनशे धारकरी घेऊन  तुम्ही गड गाठा .आम्ही खिंड लढवतो  .'
' नाही , बाजी ! तुम्हाला  सोडून आम्ही जाणार नाही .जे व्हायचं असेल ,ते  होऊ दे .'
राजे  ! आता बोलत  बसायला  फार वेळ नाही .एकदा  वडिलकीचा मान दिलात तो पाळा .गड गाठा !. 
'नाही , बाजी ! ते होणार  नाही .,
मला  सांगता ? या बाजीला ? राजे ,हि सारी  फॊज बदलांची  आहे . प्रसंग ओढवून घेतलात ,तर तुमच्या मुसक्या आवळून या पालखीतून तुम्हाला जाव  लागेल . विंजाईशपत सांगतो ,यात तिळमात्र बदल घडणार  नाही .. राजे बऱ्या बोलणं गड गाठा !
आमची  चिंता करू नका  , राजे ! तुम्ही  गड गाठा ,गडावर जाताच तोफेची इशारत द्या .तोवर एकही गनिम  या खिंडीतून  आत येणार नाही . 
,बाजी '
,बोलू नका , राजे , लहान तोंडी मोठा घास घेतला असला ,तर क्षमा करा .पण निघा  राजे  निघा , जा म्हणतो ना . 




हे ध्यानी मनी घोळवत आम्ही ती चिंचोळी खिंड पार करत होतो . आज हि या घोडखिंडीची ( पावनखिंड , गजापूर  खिंड ) भयानता  आपल्याला जाणवते . ३५० वर्ष्यापुर्वी त्याची भयाणता ,दाहकता काय असेल याचा साधा विचार देखील केला तरी रोमांच वाटतो . भर पावसाळ्यात एखादा संतप्त ओढा खळाळत ,फेसाळत कसा येत असेल . बाजींचा पट्टा ,तो तलवारीचा खणखणाट आणि आर्त किंकाळ्या कश्या असतील याचा नंगा नाच आम्ही प्रत्येक पावलावर  त्याचा अनुभव घायचा प्रयत्न करत होतो . शत्रू - शस्त्रांनी झालेल्या आघातांनी फाटलेल्या वस्त्रावर रक्ताची शिवण त्या खिंडीत चढली होती  .  आम्हाला ती चिंचोळी खिंड पार करायला ४ तास लागले .
तिथून टेम्भूरने -भातटली - गजापूर असा इतिहासातील मार्गाचा मागोवा घेत विशाळगडावर पोहचलो .
तिथून खाली दरी मध्ये बाजीप्रभू  आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी जिथे आहे तिथे मुक्काम होता . 


दिवस  चौथा :-
                        आज मोहिमेच्या समारोपाचा दिवस . डोक्यावर भगवा फेटा ,हातात काठी अह्ह्हह्ह काय दिसतायेत धारकरी . विशाळगडावर हजारो मावळे श्री छत्रपती शिवाजी महाराज ,श्री छत्रपती संभाजी महाराज ,
बाजूप्रभू देशपांडे ,नरवीर शिवा काशीद ( हा जन्मला शिवा काशीद म्हणून आणि धारातीर्थ झाला प्रतिशिवाजी म्हणू काय ते भाग्य या शिवाचे   )  फुलाजीप्रभू ,आणि यशवंत जगदाळे ( याचे नाव इतिहासात फारसे प्रचिलित नाही पण त्याचाही पराक्रम तितकाच ) याचं स्मरण करण्यासाठी  ठाकले होते . सगळीकडे फेटे बांधून घ्यायची लगबग . लक्ष्य भिडे गुरुजींच्या शब्दांकडे .



गुरुजींचे शब्द  म्हणजे  पुढच्या वर्ष भराची आमची शिदोरी . तितकी शिदोरी पुढील मोहिमेसाठी पुरते . 


आता लक्ष्य एकच ३२ मन सोन्याचं सिहांसन . . .. 



विशाळगडाविषयी थोडंसं : -
                                       हा दुर्ग पन्हाळगडापासून २० कोसांवर आहे . एकदम जबरदस्त गड . श्री विशाळगड लहान मोठ्या टेकड्यांची अशी काही विचित्र मांडणी आहे कि , तो अगदी जवळ येईपर्यंत कळतही नाही . कारण श्री विशाळगडाच्या अलीकडेच मोठी दरी आहे . जणू काही आईच बोट धरून एखादे मुलं बसल्यासारखे सह्याद्रीच्या ८ -  १०  लांब  अरुंद वाटेने श्री विशाळगड जोडला गेला आहे . तेवढी अरुंद वाट ओलांडली कि लागतात श्री विशाळगडावर नेणाऱ्या पायऱ्या . 
    हाही गड महाराष्ट्रातील इतर दुर्गाप्रमाणेच भोज शिलाहारांनी बांधला असे मानले जाते . या गडाच्या भोवताली मलिक उत्तुजार ,फाजलखान या मुसलमान सरदारांनी मराठयांशी लढाया  केल्या व त्यात ते पराभूत झाले हि इतिहासाची साक्ष आहे . 
       श्री विशाळगडावर नरवीर श्री बाजूप्रभू आणि त्यांचे बंधू श्री फुलाजीप्रभू यांच्यावर श्री शिवरायांनी अंत्यसंस्कार करवले . बाजी आणि फुलाजी या दोंघाची समाधीस्थळे अद्दापही श्री विशाळगडावरील पाताळदरीत आहेत . 
       इ . स १६८९ मध्ये औरंग्याने या गडाला वेढा दिला ,चहुबाजूनी कोंडी केली . अखेर नाईलाजाने मराठ्यांनी पांढरे निशाण दाखवले . गड त्यांच्या ताब्यात गेला अन त्याच्या खुणा आजही गडावर आहेत . गडावर प्रवेश करतानाच महादरवाजा होता . पण तो गोऱ्या लोंकानी १८१८ साली तो भुईसपाट केला . आणि पारतंत्र्याच्या काळरात्रीस प्रारंभ झाला . तेथील मुंढा दरवाजा अद्दापही आहे . श्री राजाराम महाराजांचे श्री सिंहगडावर निधन झाल्यांनतर त्यांच्या पत्नी अहिल्याबाई तथा अंबिकाबाई या हातात श्री राजाराम महाराजांचे पागोटे घेऊन सती गेल्या ,त्या जेथे सती गेल्या तेथील वृन्दावनचेही दर्शन घेतलेच पाहिजे असे पवित्र ठिकाण या गडावर आहे . या गडावरील सर्वच दरवाजे पडलेलले आहेत . सरकारवाडा नावाची वास्तू आणि एक पिराचा दर्गा आहे . गडावर दोन तळी आहेत . भोपाळतळे व अर्धचंद्र तळे आणि शेजारीच श्री महादेवाचे एक छानसे मंदिरही आहे . तेथील शिवलिंग अतिशय सुंदर आहे . श्री पन्हाळगड आणि श्री विशाळगड तसेच श्री पावनखिंड पाहिल्यानंतर श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वची ,सामर्थ्याची खूण पटेल यात संशय नाही 


काही श्लोक :- 


इतिहास  वाचू  विचारू स्वतः ला  ।
कसा ऱ्हास आणि किती नाश झाला ? ।।
उठा हिंदूंनो ! संपवू आत्मघात ।
" शिवाजी " स्मरू मंत्र नेहमी उरात ।।
 ।।  राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ ।।




ठवे पोपटांचे जिथे पेरू बाग ।
वने चंदनाची तिथे नित्य नाग ।।
दुधासाठी मांजर फिरे दारोदारी ।
जिथे स्वार्थसत्ता तिथे हे पुढारी ।।


श्लोक इथे लिहावे तितकं कमी आहे . 




मोहीम फत्ते झाली 
त्यात सहभागी हजारो धारकरी 

श्लोक साभार - योगेश देशपांडे 
छायाचित्र साभार - मनोज मरकळे , सच्चिदानंद चिटणीस 




आणखी  काही छायाचित्रे  



समारोप 

भिडे गुरुजी 

विशाळगडावरून दिसणारे भगवे वादळ 

गुरुवर्य 

बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू याची समाधी व असंख्य धारकरी 




                         

काही विशेष सूचना :- 
  १ - मसाई पठारावर  पाणी फारसे नाही त्यामुळे पाण्याची सोय 
  २ - मसाई देवी मंदिरासमोर पांडवकालीन गुहा आढळतात त्या जरूर पाहाव्यात 
  ३ - श्री पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जायला २ वाटा आहेत  - राजदिंडी , पुसाटी बुरुज 
  ४- कमीत कमी ३ दिवस वेळ काढूनच श्री पन्हाळगड ते विशाळगड करावा 
  ५ - श्री पावनखिंडीत खाली उतरून प्रवाहाच्या मार्गाने गेल्यास आपण सरळ विशाळगडाच्या                         पायथ्याची  असणाऱ्या गजापूर या गावात पोहचू . 
  ६ - पावनखिंडीचा रणसंग्राम जाणून घायचा असेल तर हि यात्रा करावी 
  ७- आपण फिरताना आपला निसर्ग , आपला इतिहास , आपणच जपयला हवा याची जाणीव ठेवावी 



                        ।।       श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान     ।।

                                      ।     राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ।

                           
                                                                                  - प्रणव अजित मांगूरकर  ( धारकरी  कोल्हापूर विभाग )